शहादा,दि.१२ (प्रतिनिधी)
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यासह विविध भागांत शासकीय स्वस्त धान्य दुकानांमधून अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात असून, नागरिकांना चांगल्या प्रतीचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद नगिन पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार हा प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश गरीब व गरजू जनता दैनंदिन उपजीविकेसाठी शासकीय स्वस्त धान्य दुकानांवर (रेशनवर) अवलंबून आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रेशन दुकानांतून मिळणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते खाण्यायोग्य नसल्याच्या तीव्र तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. या दूषित व खराब धान्यामुळे गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी म्हणून सरकारचे लक्ष वेधताना प्रा. मकरंद पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी या विषयात स्वतः वैयक्तिक लक्ष घालावे. तसेच जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांतून उच्च व चांगल्या प्रतीच्या धान्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागास तात्काळ कडक निर्देश द्यावेत.या निवेदनाच्या प्रती पुढील योग्य त्या कारवाईसाठी शहाद्याचे तहसीलदार आणि नंदुरबारचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही सविनय सादर करण्यात आल्या आहेत.











