खामगाव : गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र तथा गृह अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयाच्या परिसरात ‘रानभाजी महोत्सव २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला प्राचार्य, प्रमुख पाहुणे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नेदरलँड येथील प्रा. मोनाली पाटील (बोबडे), अमेरिकेतील प्रा. हर्षल जगदाळे (यू.एस.ए.) तसेच मनोज भाऊ सुडोकार , कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. अशोक पडघन, प्रा. डॉ. नीता बोचे, तसेच प्रा. नाना भाऊ कुटेमाटे आणि डॉ. वर्षा कोकाटे मंचावर उपस्थित होते.
रानभाज्यांची ओळख, त्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन आणि स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.
महोत्सवाच्या ठिकाणी विविध रानभाज्यांचे माहितीपर स्टॉल आकर्षक पद्धतीने उभारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तांदुळजा, मायाळू, अळू, शेवगा, आंबाडी, चाकवत, कुरडू, भारंगी, टाकळा, घोळ, केना, हादगा आदी रानभाज्यांचे प्रत्यक्ष नमुने सादर करून त्यांची ओळख, उपलब्धता, हंगाम, पौष्टिक मूल्य, औषधी उपयोग आणि आहारातील महत्त्व याबाबत माहिती दिली. रानभाज्यांमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय घटक आणि इतर पोषक तत्त्वांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध खाद्यपदार्थ. विद्यार्थिनींनी रानभाजीची भाजी, भजी, थालीपीठ, पराठे, वडे, विविध चटण्या, पकोडे यांसह पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण पदार्थांचे स्टॉल उभारले होते. उपस्थितांनी या स्टॉलना भेट देऊन पदार्थांची चव घेतली. त्यामुळे रानभाज्यांचा विविध पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांमध्ये उपयोग करता येतो, याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांना मिळाला.
यावेळी रानभाज्यांवर आधारित पोस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे महत्त्व, पौष्टिकता, औषधी गुणधर्म, शाश्वत शेती आणि स्थानिक जैवविविधता यांसारख्या विषयांवर आकर्षक पोस्टर्स तयार करून सादर केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळाली.
प्रमुख पाहुण्या प्रा. मोनाली पाटील (बोबडे) यांनी रानभाज्या या निसर्गाची अमूल्य देणगी असून त्यामध्ये अनेक पौष्टिक व औषधी गुणधर्म आढळतात, असे सांगितले. आधुनिक जीवनशैलीमध्ये पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घेऊन त्यांचा आहारात योग्य वापर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. हर्षल जगदाळे यांनी रानभाज्यांचे संवर्धन म्हणजे जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञानाचे संवर्धन होय, असे सांगितले. अशा महोत्सवातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता निसर्गाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी रानभाज्या या ग्रामीण आणि पारंपरिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. पूर्वीच्या काळात आपल्या पूर्वजांनी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून आरोग्यदायी जीवनशैली जोपासली; मात्र आधुनिक जीवनशैलीमुळे हे पारंपरिक ज्ञान हळूहळू दूर जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख करून देणे आणि त्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला रानभाजी महोत्सव हा विद्यार्थ्यांना ‘Learning by Doing’ म्हणजेच कृतीतून शिक्षण देणारा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे नमुने गोळा करून त्यांची माहिती सादर केली, पोस्टर्स तयार केली आणि रानभाज्यांपासून विविध खाद्यपदार्थ तयार करून स्टॉल उभारले. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, संघभावना, उद्योजकता आणि व्यवहारज्ञान विकसित होण्यास मदत होते, असे प्राचार्य डॉ. तळवणकर यांनी सांगितले.
या महोत्सवाला विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावचे अध्यक्ष डॉ. सुभाष शंकरराव (दादासाहेब) बोबडे, उपाध्यक्ष प्रकाशजी तांबट, सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे, कोषाध्यक्ष अजिंक्यदादा बोबडे, निसर्ग ग्रुप खामगावच्या अध्यक्षा सौ. निताताई बोबडे तसेच मंडळाचे मान्यवर सदस्य यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची पाहणी केली व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे संचालन कु. वैष्णवी घोगले आणि कु. नेहा गवळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वर्षा कोकाटे यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाचे संयोजक प्रा.मुकिंदा सपकाळ , प्रा.रंगनाथ ठोंबरे , तसेच प्रा. ज्ञानेश्वर गायगोळ, प्रा. मनीषा राठोड, प्रा. रुपेश दहिभात, गजानन हिवाळे आणि राजू गरुड यांच्यासह विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मान्यवरांनी वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र तथा गृह अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. रानभाज्यांचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन या तिन्ही बाबींचा सुंदर समन्वय साधणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
माननीय संपादक / जिल्हा प्रतिनिधी,
वरील बातमी छायाचित्रासह आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे, ही नम्र विनंती.









