“असदखा मुनवरखा पठाण यांचे अमरण उपोषण सुरू”
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
मानवत शहरातील ऐतिहासिक जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षकांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी असदखा मुनवरखा पठाण यांनी १३ ऑगस्ट २०२६ पासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी (माध्यमिक) चे सुमारे १३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी केवळ ४ शिक्षकच उपलब्ध आहेत. गरीब आणि रोजमजुरी करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना योग्य शिक्षण मिळावे आणि रिक्त असलेली शिक्षकांची पदे तातडीने भरली जावीत, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
“गरीब आहेत म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार का? ‘शिक्षक द्या हो शिक्षक'” असे सवाल करत उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत शाळेला पुरेशा प्रमाणात शिक्षक दिले जात नाहीत, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या उपोषणामुळे मानवत परिसरातील शैक्षणिक वर्तुळात आणि पालकांमध्ये प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.









