“बँक ऑफ बडोदा, मानवत शाखेला शेतकऱ्यांचे निवेदन; पीक कर्ज न मिळाल्यास दुधना नदीपात्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा”
दै.सूर्यवर्ता
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
मानवत तालुक्यातील इरळद येथील शेतकऱ्यांनी बँक ऑफ बडोदा, मानवत शाखेच्या व्यवस्थापकांना निवेदन देत नवीन पीक कर्ज मंजूर करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिनांक 30 जुलै 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात, सततची नापिकी, दुष्काळ तसेच ओला दुष्काळ यामुळे यापूर्वी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळेत करता आली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी बँक ऑफ बडोदा, मानवत शाखेकडून पीक कर्ज घेतले होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जाची नियमित परतफेड करता आली नाही. त्यानंतर बँकेच्या सूचनेनुसार 2024 मध्ये OTS (वन टाईम सेटलमेंट) अंतर्गत कर्जाची रक्कम भरून कर्ज निकाली काढण्यात आले.
यानंतर नवीन पीक कर्जासाठी बँकेत अर्ज केला असता, पुढील पाच वर्षे पीक कर्ज मिळणार नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. कर्जाची पूर्ण परतफेड करूनही शासनाच्या कर्जमाफी योजनेत समावेश नसताना नवीन पीक कर्ज नाकारले जात असल्याने अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी बँक व्यवस्थापनाला तातडीने नवीन पीक कर्ज मंजूर करण्याची मागणी केली असून, 15 दिवसांच्या आत पीक कर्ज मंजूर न झाल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी मौजे इरळद येथील दुधना नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास बँक प्रशासन व संबंधित यंत्रणा जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, परभणी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, परभणी तसेच पोलीस अधीक्षक, परभणी यांनाही देण्यात आल्या आहेत.
निवेदनावर स्वाक्षरी करणारे शेतकरी
विठ्ठल रामकिशन मुुळे (इरळद)
मुंजाभाऊ मारोतराव बारहाते
हनुमान मुंजाभाऊ बारहाते
इंदर आबासाहेब मुुळे
बालासाहेब रावसाहेब मुुळे
गजानन प्रभाकरराव बारहाते
रामराव रावसाहेब मुळे
ज्ञानोबा बालासाहेब बारहाते
महानंदा रामेश्वर बारहाते
उषा विठ्ठलराव मुळे
आबासाहेब रामराव मुळे








