श्रीरामपूर (प्रतिनिधी) : जमीनीतील सेंद्रीय कर्ब कमी झाला असून माती ताकदवान बनविण्यासाठी मातीचे परीक्षण करून योग्य प्रमाणात खतांचे नियोजन केल्यास भरघोस उत्पन्न मिळेल व मातीचे आरोग्य सुधारेल, असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी तज्ञ डॉ. भीमराव कांबळे यांनी व्यक्त केला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मृद विज्ञान विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय समन्वित माती परीक्षण पीक प्रतिसाद संशोधन प्रकल्प, मृद विज्ञान विभाग आणि बेलापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजना कार्यक्रम बेलापूर येथे संपन्न झाला.
यावेळी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरद नवले, बाजार समिती माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीना साळवे, जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ, चंद्रकांत नवले, पत्रकार देविदास देसाई, प्रदीप आहेर, सुहास शेलार, रावसाहेब अमोलिक, पोपट पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ प्रसारीत ‘ फुले मायक्रोग्रेड -२ ‘ (द्रवरूप सुक्ष्म अन्नद्रव्य), ‘ फुले बायोमिक्स ‘ (जीवाणू संवर्धन) आणि कृषी दर्शनीसह कृषी निविष्ठांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. क्रांती पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजयकुमार पाटील यांनी पिकांना योग्य खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. शुभांगी कदम यांनी माती परीक्षण कसे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. बेलापूर ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांच्या शेतातील माती परीक्षणासाठी पाठवली जाणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी पौर्णिमा गाडे व कृषी सहाय्यक ज्योती वाडकर यांनी परिश्रम घेतले.








