विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात प्रभात फेरी; राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी रंगला स्वातंत्र्य दिनाचा सोहळा
प्रतिनिधी | केज
शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी जिवाचीवाडी हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७ वाजता शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रमेशजी चौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गावातून भव्य प्रभात फेरी काढली.
प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या घोषणा देत तसेच ढोल-ताशांच्या गजरात गावातील वातावरण देशभक्तीमय केले. भारतमाता, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी आदी ऐतिहासिक व राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
प्रभात फेरी शाळेच्या मैदानावर आल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक भिकारामजी सारूक, गोपीनाथराव चौरे, उपसरपंच सत्यनारायण चौरे यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी गावच्या सरपंच सौ. प्रेरणा दीपक काळे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय चिंतामण दादा चौरे यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांच्या शुभहस्ते जिवाचीवाडी हायस्कूलच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत व वंदे मातरम् गीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच देशभक्तीपर गीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाने गौरव
मुख्य कार्यक्रमानंतर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रमेशजी चौरे सर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी सरपंच सौ. प्रेरणा दीपक काळे, उपसरपंच सत्यनारायण चौरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चिंतामण दादा चौरे, भिकारामजी सारूक, युवा कार्यकर्ता भागवत चौरे तसेच पालकांची प्रमुख उपस्थिती होती. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पालक, युवा मित्र, महिला वर्ग तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किलमिसे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. मुळे सर यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेशजी चौरे सर, श्री. जगताप सर, श्री. किलमिसे सर, श्री. ढाकणे सर, श्री. मुळे सर, श्री. बी. जी. चौरे सर, श्री. महादेवराव चौरे व श्री. ओमप्रकाश सारुक यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिवाचीवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी, देशभक्तीपर गीते, सामूहिक कवायत व विविध स्पर्धांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. संपूर्ण कार्यक्रमामुळे शाळेच्या परिसरात देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.










