रस्त्याच्या दुरवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; १६ ऑगस्टला गाव बंदचा निर्णय
कडेगाव : चिंचणी गावातील मुख्य रस्ता प्रजिमा क्र. १८ (MDR-18) या रस्त्याची गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत चिंचणी (वांगी) समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
रस्त्याची दुरवस्था, खड्डे आणि पावसाळ्यात साचणारे पाणी यामुळे विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सदर रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत १४ ऑगस्टपर्यंत अधिकृत लेखी पत्र देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय, चिंचणी (वांगी) समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
या आंदोलनाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून, ग्रामसभेत रस्त्याच्या प्रश्नावर ठराव करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनेही संबंधित प्रशासनाला पत्र देऊन उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्या वतीने रविवार, १६ ऑगस्ट रोजी चिंचणी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील दुकाने तसेच आठवडी बाजार बंद ठेवून रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
रस्त्याच्या प्रश्नावर पीडब्ल्यूडीच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली असली तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता चिंचणीकर आक्रमक झाले असून, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.










