अभाविपच्या तिरंगा यात्रेत १७०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
खारघर | प्रतिनिधी |श्रीनाथ (गणेश) लाड|
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने खारघरमध्ये भव्य ११११ फूट तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून सुरू झालेली ही राष्ट्रभक्तीने भारलेली यात्रा उत्सव चौक येथे पोहोचली. या यात्रेत पनवेल व खारघर परिसरातील १७०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाप्रतीचा सन्मान आणि देशभक्तीची भावना व्यक्त केली.
तिरंगा यात्रेमुळे संपूर्ण खारघर परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. हातात तिरंगा आणि मनात राष्ट्रप्रेमाची भावना घेऊन विद्यार्थी व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व यांचा संदेश देणाऱ्या या यात्रेत युवा शक्तीचा उत्साह विशेष आकर्षण ठरला.
यात्रेचा समारोप उत्सव चौक येथे करण्यात आला. यावेळी अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री कु. पायल किनाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवा पिढी ही देशाचे भविष्य असून, केवळ स्वप्ने पाहण्यापेक्षा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘भारत माझ्यासाठी काय करणार?’ यापेक्षा ‘मी भारतासाठी काय करणार?’ हा विचार प्रत्येक युवकाने मनात रुजवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर मा. नितीन पाटील, अभाविप जिल्हा संयोजक ऋतुजा भोर तसेच पनवेल महानगर मंत्री नील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभाविपच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याबरोबरच देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी युवा पिढीला प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अभाविप करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अभाविप ही विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा देणारी जगातील मोठी विद्यार्थी संघटना असल्याचेही त्यांनी सांगितले.
यात्रेच्या समारोपानंतर सहभागी झालेल्या विविध शाळा व महाविद्यालयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी खारघरचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. ११११ फूट लांबीच्या तिरंग्याच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, एकता आणि देशसेवेचा संदेश देणारी ही तिरंगा यात्रा खारघरवासीयांच्या स्मरणात राहणारा राष्ट्रभक्तीचा भव्य सोहळा ठरली.












