
अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी
अमळनेर : प्रतिनिधी
शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवक तसेच महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांचा अमळनेर तालुका राजपूत एकता मंचाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांची भेट घेऊन निवेदन साद केले. दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात दोन गंभीर घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवरे, ता. पारोळा येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांच्यावर काही ग्रामस्थांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. जीव वाचविण्यासाठी पळत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात ७ ऑगस्ट २०२६ रोजी पथदिव्यांची दुरुस्ती करत असलेल्या महापालिकेच्या कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी (वय ३१) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे मंचाने निवेदनात म्हटले आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी
“कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण ही शासनाची जबाबदारी आहे,” अशी भूमिका मांडत वरील घटनांची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंचाने केली.
राजपूत समाजातील दोन्ही पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत. तसेच भविष्यात शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी ठोस सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
अशा घटनांमुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजावरही विपरीत परिणाम होतो, असे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मंचाचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह अनिल पाटील, चेतन राजपूत, जयराम पाटील, विलास पाटील, जयदीप पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, अमोल राजपूत, कुणाल गिरासे, भोजराज राजपूत, दिलीप पाटील, रोहिदास पाटील, विक्रम पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, प्रकाश पाटील, समाधान धनगर, अजयसिंग पाटील, आशिष राजपूत, भरतसिंग पाटील आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
