
कृषी विभाग व ‘आत्मा’चे आयोजन; स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व आणि पोषणमूल्यांची माहिती
दर्यापूर : प्रतिनिधी
पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दर्यापूर येथील अनंत संगम मंगल कार्यालयात ‘रानभाजी महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पावसाळ्याच्या दिवसांत पारंपरिक भाज्यांची उपलब्धता कमी होत असताना स्थानिक परिसरात मिळणाऱ्या विविध रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. या पारंपरिक व नैसर्गिक अन्नसंपत्तीची नागरिकांना ओळख व्हावी, रानभाज्यांचे पोषणमूल्य व आरोग्यदायी फायदे समजावेत तसेच त्यांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
महोत्सवात करटोली, दिंडा, टाकळा, आंबुशी, आघाडा, केना, पाथरी, शेवगा, अळू, पानाचा ओवा, कपाडकोडी, बांबू, उंबर, अंबाडी, मटारू आणि भुई आवळी यांसह विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.
या महोत्सवाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी कु. आरती साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, तंत्र अधिकारी प्रताप रोडे, संतोष राणे, अमोल सावरकर, विपीन चंदनकर, प्रगतिशील शेतकरी सुभाष लाजूरकर, कु. फाल्गुनी नानीर, गुणनियंत्रण अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रानभाज्यांचे महत्त्व अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच रानभाज्यांसाठी विपणन साखळी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवात नागरिक, गृहिणी, युवक-युवती, शेतकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रानभाज्यांपासून तयार करण्यात येणारे विविध चविष्ट व पौष्टिक पदार्थ, त्यांचे आरोग्यदायी फायदे आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध नैसर्गिक अन्नसंपत्ती याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये रानभाज्यांविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. आरती साबळे यांनी केले. उपकृषी अधिकारी कुणावत यांनी सूत्रसंचालन केले, तर कु. फाल्गुनी नानीर यांनी आभार मानले.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आत्माचे सागर बोंडे, विशाल भडके, पाणी फाउंडेशनचे सूरज कोरडे आणि गौरव नागे यांनी विशेष परिश्रम घेतले.

