पातूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा, १००% पिक विमा मंजूर करा
प्रदीप ताजने
पातूर प्रतिनिधी |
२४ जून २०२६
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पातूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना १०० टक्के पिक विमा मंजूर करावा व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी श्री. शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुका यांच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे विनंती अर्ज आज तहसीलदार, पातूर यांच्यामार्फत मा. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाअभावी पातूर तालुक्यातील पिके सुकत आहेत व काही ठिकाणी पिके वाळलेली आहेत. पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी पिक विमा कंपनीला कळवू शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये सर्व्हे करून शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करावी.
गेल्या काही दिवसात सोयाबीन व पावसाळी पिकांची गळती होत असून संपूर्ण पिकांचे नुकसान होत आहे. आज रोजी शेतकऱ्यांनी शेतीसाठी बि-बियाणे, खत व महागड्या औषधी फवारणी देऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी हा संकटात सापडलेला असून तो चिंतेने व्याकूळ झालेला आहे. शेतकरी हा आत्महत्येसाठी प्रवृत्त होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी मा. महोदयांनी पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के पिक विमा मंजूर करून व कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही तात्काळ देण्यात यावी अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.









