नवजात शिशू अतिदक्षता कक्षात पहाटे साडेतीन वाजता थरारक घटना; सहा अर्भकांवर सुपर स्पेशालिटीमध्ये उपचार, अग्निसुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह
अमरावती / प्रतिनिधी
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षात सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आग आणि धुरामुळे कक्षात एकच खळबळ उडाली. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांनी तातडीने बालकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला.
या घटनेत सहा नवजात बालकांना उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यापैकी काही बालकांच्या हाताला व पायाला भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आगीमुळे आजूबाजूच्या कक्षांमधील काही बालकांनाही सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले.
व्हेंटिलेटरमध्ये स्फोटानंतर आग भडकली?
प्राथमिक माहितीनुसार, नवजात शिशू अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आग लागून काही क्षणांतच धुराचे लोट कक्षात पसरले. मात्र, व्हेंटिलेटरमध्ये नेमका स्फोट कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची सखोल चौकशी झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे तीन कक्ष आहेत. प्रत्येक कक्षाची क्षमता १३ बालकांची असून, एकूण ३९ नवजात बालकांवर उपचार करण्याची व्यवस्था आहे. दुर्घटना घडलेल्या कक्षात त्या वेळी एकूण १२ बालके होती. आग लक्षात येताच ड्युटीवरील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांनी बालकांना बाहेर काढण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले.
वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या विभागाच्या सुरक्षेवर प्रश्न
विशेष म्हणजे, नवजात शिशू अतिदक्षता विभाग अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत अत्याधुनिक विभागात आग लागणे आणि त्यानंतर अग्निसुरक्षा यंत्रणा कितपत कार्यान्वित झाली, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रुग्णालयात आग लागल्यानंतर अग्निशामक यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाली होती का? आग विझविण्यासाठी उपलब्ध साधनसामग्री पुरेशी होती का? नवजात बालकांच्या कक्षात नियमित अग्निसुरक्षा तपासणी केली जात होती का? तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते का, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.
तीन चिमुकल्यांचा मृत्यू; पालकांवर दुःखाचा डोंगर
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तीन नवजात बालकांमध्ये पूजा बोरगे (रा. पुलगाव, जि. वर्धा) यांच्या मुलाचा, गायत्री प्रफुल चोपडे (रा. मुरखेड, ता. अंजनगाव सुर्जी) यांच्या मुलाचा आणि किरण बेठेकर (रा. बोराळा, ता. चिखलदरा) यांच्या मुलीचा समावेश आहे.
आपल्या नवजात बाळाला उपचार मिळावेत, या आशेने पालकांनी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, पहाटे घडलेल्या या दुर्घटनेने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तीन निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेल्याने अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
या घटनेनंतर रुग्णालयातील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित झाली होती का, सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का आणि या दुर्घटनेला कोणाची जबाबदारी आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. सरकार व आरोग्य विभाग या दुर्घटनेची कशी दखल घेतात आणि रुग्णालय प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








