
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील खवशी गावातील तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे खवशीसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र उर्फ विरू (वय ७) हा तलावाजवळ असताना पाण्यात गेला. तो पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे (वय ३२) यांनी मुलाला वाचवण्यासाठी तलावात प्रवेश केला. मात्र, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने दोघेही अडचणीत सापडले आणि या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

मृत अण्णा तलवारे आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र हे मूळचे आर्वी (जि. धुळे) येथील रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते खवशी येथे सासुरवाडीत वास्तव्यास होते. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांसह ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.
या दुर्घटनेनंतर तलावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. बाप-लेकाच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

