
आळंदी येथे ३० वा राज्यस्तरीय संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
नाशिक | प्रतिनिधी :
आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पवित्र तीरावर ३० वा राज्यस्तरीय संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार सोहळा दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडला. के. एस. आय. पब्लिकेशन, कोल्हापूर यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार श्री. मनीष कांतीलाल मुथा यांना पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल मानाचा ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता क्षीरसागर यांनी केले. कवी इंगळी संमेलनाचे अध्यक्ष दशरथ बाबासाहेब धायगुडे, उद्घाटक कवी दीपक पवार, स्वागताध्यक्ष सी.ए. डॉ. घनश्याम अदानी आणि प्रमुख मार्गदर्शक श्री. श्रीकांत श्रीपाद पाटील यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
कवी सरकार इंगळी अर्थात विलास पाटील यांनी आपल्या संघर्षातून साहित्यिक क्षेत्रात स्थान निर्माण करत नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी त्यांच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले.
इंद्रायणीच्या पावन तीरावर पार पडलेल्या या साहित्यिक सोहळ्यामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांचे उपस्थित मान्यवर व साहित्यप्रेमींनी अभिनंदन केले.
