
अमळनेर (प्रतिनिधी):
२७ ऑगस्ट २०२६: तालुक्यातील टाकरखेडा येथे एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नीने आपल्या दोन निष्पाप मुलांसह धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत सामूहिक आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना आज, २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात तीव्र खळबळ उडाली आहे.
पहाटे घरातून निघाले आणि घात झाला
मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथील रहिवासी सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पहाटे ४ वाजेच्या सुमारास ते दुसरी इयत्तेत शिकणारा मुलगा सनी आणि अंगणवाडीत जाणारा लहान मुलगा राज या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी रेल्वे रुळाकडे धाव घेत धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेची धडक एवढी भीषण होती की, चौघांचाही जागीच अंत झाला.
रेल्वे प्रशासनाची पोलिसांना माहिती व घटनास्थळी धाव
पहाटे ४:४० वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर मृतदेह पडल्याचे निदर्शनास येताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने अमळनेर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची कारवाई सुरू केली.
गावावर शोककळा; कौटुंबिक वादाची चर्चा
एकाच घरातील चार जणांचा असा करुण आणि दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गावावर तीव्र शोककळा पसरली आहे. या सामूहिक आत्महत्येचे अधिकृत कारण अद्याप समोर आले नसले, तरी प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून हा टोकाचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. अमळनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
