अवैध पाणी उपसा रोखण्यासह २४ तास गस्त आणि संयुक्त कारवाई पथकाची मागणी
सायगाव, ता. येवला | २७ ऑगस्ट २०२६
डोंगरगाव कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, कालव्यातील अवैध पाणी उपसा तातडीने थांबवावा तसेच कालवा सुरक्षेसाठी २४ तास गस्त सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज सायगाव येथील रोकडोबाचा पार येथे भागवतराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
सायगाव, वाईबोथी, न्यारखेडे, अंगुलगाव, डोंगरगाव तसेच पुढील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना नियोजनानुसार पुरेसे सिंचनाचे पाणी मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. कालव्याच्या वरील भागात अनधिकृत डोंगळे व मोटारी बसवून पाणी उपसा करणे, पाणी वळविणे तसेच कालव्याच्या संरचनेचे नुकसान करण्याच्या तक्रारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सात आउटलेटला नियोजनानुसार पाणी देण्याची मागणी
डोंगरगाव कालव्यावरील डोंगरगाव, अंगुलगाव १ ते ४, वाई बोथी २ आणि वाई बोथी या सातही आउटलेटला नियोजनानुसार पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. डोंगरगाव बंधारा पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत आवश्यक पाणीप्रवाह सुरू ठेवून पुढील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही नियमानुसार सिंचनाचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
२४ तास गस्त व संयुक्त कारवाई पथकाची मागणी
डोंगरगाव ते दरसवाडीपर्यंतच्या संपूर्ण कालवा हद्दीत अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पोलीस व कालवा विभागाचे संयुक्त पथक आणि २४ तास गस्तीचे वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अनधिकृत मोटारी, डोंगळे किंवा अन्य साहित्य आढळल्यास ते जप्त करण्यासाठी कालवा विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आवश्यक यंत्रसामग्री व वाहतूक वाहनासह स्वतंत्र कारवाई पथक नियुक्त करावे, अशीही मागणी आहे.
कालवा फोडणे, संरचनेचे नुकसान करणे, अनधिकृत मोटारी बसविणे अथवा खालच्या लाभक्षेत्राकडे जाणारा पाण्याचा प्रवाह अडविणाऱ्यांवर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
प्रशासनाच्या संयुक्त पाहणीची मागणी
जलसंपदा विभाग, कालवा विभाग, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डोंगरगाव कालव्याची संयुक्त पाहणी करून सर्व लाभक्षेत्रातील आउटलेटपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी आवश्यक पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी शेवटच्या लाभक्षेत्रापर्यंत पोहोचेपर्यंत या प्रश्नाचा लोकशाही व कायदेशीर मार्गाने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल,” अशी भूमिका भागवतराव सोनवणे यांनी व्यक्त केली.
