कोल्हापूर जिल्ह्याला कोकणाशी कमी अंतराने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी घाटरस्त्याच्या कामाला मिळाली गती
भुदरगड | प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्ह्याला कोकणाशी कमी अंतराने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी घोटगे-सोनवडे-शिवडाव घाटरस्त्याच्या कामाला अखेर महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. केंद्रीय पर्यावरण समितीने या घाटरस्त्याच्या प्रस्तावाला स्टेज-१ परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भुदरगड तालुक्यासह कोल्हापूर व कोकणातील दळणवळणाला मोठी चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
सुमारे ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या घाटमार्गामुळे कोल्हापूर आणि कोकणातील प्रवासाचे अंतर कमी होण्यास मदत होणार असून, या भागातील वाहतूक, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
केंद्रीय पर्यावरण समितीच्या पाहणीदरम्यान एक्स्पर्ट अप्रायजल समितीचे अध्यक्ष मनमोहन सिंह, सदस्य नीरज शर्मा, डॉ. व्ही. के. जैन, डॉ. रमेश, कार्यकारी अभियंता बी. एल. हजारे, अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, उपअभियंता महेश कांजर आणि शाखा अभियंता सागर कुंभार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी समितीसमोर प्रस्तावाबाबत सकारात्मक अहवाल जावा यासाठी प्रयत्न केले.
विविध लोकप्रतिनिधींचे प्रयत्न
घाटरस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला.
तसेच माजी आमदार कै. दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनीही या घाटरस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
केंद्रीय पर्यावरण समितीकडून स्टेज-१ परवानगी मिळाल्याने या बहुप्रतीक्षित घाटमार्गाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा असून, प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास कोल्हापूर-कोकण संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
