एसटी सेवा तातडीने सुरू न केल्यास फलटण आगारासमोर धरणे आंदोलनाचा इशारा
फलटण | प्रतिनिधी
फलटण-सासकल एसटी बससेवा गेल्या सहा वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, नागरिकांना प्रवासासाठी खासगी वाहने व रिक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे.
एसटी बंद असल्याचा फायदा घेत रिक्षाचालक व खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
एसटी सेवा सुरू करण्याबाबत फलटण आगार प्रमुख मुल्ला मॅडम तसेच वाघमारे साहेब यांच्याकडे वारंवार मागणी करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थी व ग्रामस्थांनी केला आहे.
फलटण-सासकल एसटी बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अन्यथा फलटण एसटी स्थानकासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सासकलच्या सरपंच सौ. सोनालीताई मंगेश मदने, माजी सरपंच हनुमंत गंगाराम मुळीक, चांगुणाबाई सर्जेराव मुळीक, लक्ष्मीबाई रमेश आडके, राजेंद्र धोंडीबा घोरपडे व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.
यावेळी रणजितदादा युवा मंचचे अध्यक्ष दिनेश मुळीक, सासकल जनआंदोलन समितीचे उपाध्यक्ष विनायक नारायण मदने तसेच ज्ञानेश्वर नरसिंग मुळीक, कमलाकर आडके, अजित मुळीक, तुषार मुळीक, सागर चोपडे, प्रशांत मुळीक, देविदास सुतार, देविदास चांगण, निखिल चांगण, मधुकर घोरपडे, गोरखनाथ मुळीक, तेजस मुळीक यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या प्रवासाची गैरसोय लक्षात घेता फलटण-सासकल एसटी सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
