शहरातील मिशन स्कूल समोरून निघणारा आणि लोणखेडा बायपासला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा बी. डी. पाटील रस्ता सध्या वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. जड आणि मोठ्या वाहतुकीसाठी पर्यायी व सोयीस्कर मार्ग म्हणून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचे काम होऊन अवघे सुमारे १२ महिनेही पूर्ण झालेले नाहीत; तरीही रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
नुकतीच या मार्गावरून जाणारी विटांची एक ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्यावरील खोल खड्ड्यात आणि निसरड्या मातीत एका बाजूला कलंडली. सुदैवाने ट्रॉली पूर्ण उलटली नाही, मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विटांचा ढीग कोसळला. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवून मदतकार्य केल्याने जीवितहानी टळली असली, तरी अशा बिकट रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच रस्ता तयार करताना पाणी वाहून जाण्यासाठी बाजूला गटारीकरिता खोदकाम करण्यात आले होते. मात्र ठेकेदार आणि संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे काम पुढे झालेच नाही. सध्या या खोदलेल्या चारींमध्ये माती आणि कचरा साचून ते न खोदल्यासारखे सपाट झाले आहे. पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून रस्त्याची माती उखडून गेली आहे. वर्षभरातच रस्ता उखडला, मग या निकृष्ट दर्जाच्या कामाला जबाबदार कोण?
कोट्यवधींचा निधी खर्च करूनही सामान्य नागरिक आणि वाहनचालकांना चिखल तुडवत का जावे लागत आहे?
संबंधित ठेकेदार आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार?
मिशन स्कूल परिसर आणि बायपासला जोडणारा हा मार्ग रोजच्या शेकडो नागरिकांच्या आणि अवजड वाहनांच्या वापराचा आहे. प्रशासनाने त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करून अर्धवट गटारीचे काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त वाहनचालक व नागरिकांनी दिला आहे.










