कारी, ता. बार्शी : बार्शी तालुक्यातील कारी गाव व परिसरात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी सोयाबीन, तूर, उडीद, मका यांसह विविध पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पेरणीनंतर सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसानंतर अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या काळातच पाण्याचा ताण निर्माण झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तूर, उडीद व मका पिकांचीही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.
पावसाअभावी निर्माण झालेल्या या परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारी गावासह बार्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच शासनाच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला असून पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवणार आहे. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाकडे नुकसानाचा अहवाल सादर करावा आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी कारी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.






