आजरा : येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये बंधुभाव, स्नेह, आपुलकी व सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थीनींनी स्वतःच्या कल्पकतेतून व कौशल्यातून आकर्षक राख्या तयार केल्या होत्या. या स्वयंनिर्मित राख्या त्यांनी प्रशालेतील विद्यार्थी बंधूंना बांधून रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे संपूर्ण प्रशालेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावी ‘ब’चे वर्गशिक्षक श्री. एस. वाय. भोये यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी-विद्यार्थिनींनी केले. यावेळी व्यंकटराव शिक्षण संकुलाचे संचालक श्री. सचिन (भैय्या) शिंपी यांचे प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थीनी तसेच प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार व शिक्षिकांनी औक्षण करून त्यांना राखी बांधली. यानंतर प्रशालेतील सर्व शिक्षक बंधूंनाही विद्यार्थीनींनी प्रेमपूर्वक राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गातील भगिनींकडून राखी बांधण्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थीनींनी आपल्या बंधूंच्या मनगटावर राखी बांधत परस्पर स्नेह, प्रेम आणि संरक्षणाची भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये आपुलकीचे आणि कौटुंबिक वातावरण निर्माण झाले.
रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून परस्पर प्रेम, विश्वास, जिव्हाळा, स्नेह आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा सण आहे. या भावनेतून प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य श्री. एस. एन. पाटील, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया पाईम ,तनिष्का मांगले यांनी केले व अंकिता देसाई, गुंजन मोरे, वैष्णवी मातले, हंसिका नाईक, कविता सांगणे ,भाग्यश्री इलगे यांनी रक्षाबंधन बद्दल माहिती सांगितली. तसेच आभार मानसी पवार यांनी मांडले.










