सोयाबीन, तूर, कापूस, हळद, मूग व ऊस पिकांवर पावसाअभावी संकट; रोग-किडींच्या प्रादुर्भावाची भीती
प्रतिनिधी | चातारी : पावसाने गेल्या काही दिवसांपासून दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी काही भागातील सोयाबीन पीक सुकून गेले असून, शेतात उभ्या पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. ऐन हंगामात पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन पिकाला सध्या पाण्याची नितांत गरज असताना पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी सोयाबीनची पाने वाळून पिके कोमेजत आहेत. फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेतील पिकांना पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यासोबतच तूर, कापूस, हळद, मूग आणि ऊस या पिकांवरही पावसाअभावी परिणाम होत आहे. हवामानातील बदल आणि पिकांवरील ताणामुळे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. मुळकूज, खोडकूज, चारकोल रॉट, पिवळा मोझॅक, मर, कंदकूज आणि पानांवरील ठिपके यांसारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी, चक्री भुंगा, खोडमाशी, शेंगा पोखरणारी अळी आणि बोंडअळी यांसारख्या किडींच्या प्रादुर्भावाचीही भीती व्यक्त होत आहे.
पावसाचा खंड आणखी काही दिवस कायम राहिल्यास पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढू शकतात. त्यामुळे संबंधित कृषी विभागाने पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान, पिकांची सद्यस्थिती पाहता शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच पिकांचे व्यवस्थापन करावे, तसेच रोग-किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी!
ऐन हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. पावसाने लवकर हजेरी लावून पिकांना जीवदान द्यावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
