
वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे डॉ. संजय नागनाय यांचे आवाहन
जळकोट (प्रतिनिधी) : जळकोट शहरातील डांबरी रस्त्यावर एका वानराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी एकत्र येत वानरावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले. नागरिकांनी दाखविलेल्या या संवेदनशीलतेचे परिसरातून कौतुक होत आहे.
रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अशा घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालविताना रस्त्यावर येणाऱ्या प्राणी व पक्ष्यांकडे लक्ष देऊन वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन करण्यात आले.
डॉ. संजय नागनाय कलवले यांनी सर्व मोटार वाहनचालकांना नम्र विनंती करताना, “वाहने सावकाश चालवा आणि रस्त्यावर आढळणाऱ्या मुक्या प्राण्यांची काळजी घ्या,” असे आवाहन केले.
तसेच जखमी किंवा संकटात सापडलेल्या प्राण्यांची माहिती मिळाल्यास त्यांना शक्य ती मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले. ‘पशुसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून नागरिकांनी प्राण्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे डॉ. संजय नागनाय कलवले यांनी सांगितले.
नागरिकांच्या या संवेदनशील उपक्रमामुळे प्राणीमात्रांविषयीची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
