
महिला व मुलांच्या ढोल-ताशा पथकाने वेधले सर्वांचे लक्ष; जयघोषाने शहर दुमदुमले
श्रीगोंदा | प्रतिनिधी : आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३५व्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा शहरात भव्य मिरवणूक आणि अभिवादन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मिरवणुकीत मुला-मुलींसह महिलांच्या ढोल-ताशा पथकाने दमदार वादन करत उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
प्रमुख पाहुणे भाऊसाहेब शिंदे, खासदार निलेश लंके, माजी मंत्री बबनराव पाचपुते, समाजसेविका तृप्ती देसाई तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना भाऊसाहेब शिंदे म्हणाले, “ब्रिटिश सत्तेविरुद्ध देशातील पहिला सशस्त्र लढा उभारणारे राजे उमाजी नाईक हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचे आणि ऊर्जेचे स्रोत आहेत. त्यांचा शौर्याचा इतिहास आजच्या तरुण पिढीने अंगीकारणे गरजेचे आहे.”
महिला व मुलांच्या ढोल पथकाने वेधले लक्ष
मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले ते मुलांचे आणि विशेषतः महिलांचे ढोल-ताशा पथक. पारंपरिक वेशभूषेत आणि डोक्यावर फेटा परिधान करून महिलांनी केलेल्या शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वादनाने संपूर्ण श्रीगोंदा शहर दुमदुमून गेले. या पथकाचे उपस्थित नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे कौतुक करण्यात आले.
जयघोषाने शहर दुमदुमले
‘जय राजे उमाजी नाईक’ अशा गगनभेदी घोषणांनी मिरवणुकीचा मार्ग दुमदुमून गेला. शहरातील प्रमुख चौकांमध्ये नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती. या सोहळ्यास श्रीगोंदा शहर व परिसरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तरुण, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
