
‘अन्याय निवारण समिती’चे आजरा नगरपंचायतीला निवेदन; आश्वासने नकोत, प्रत्यक्ष कारवाईची मागणी
आजरा | प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायत हद्दीतील गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गांची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच मार्गावरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि भटकी जनावरे यांसारखे अडथळे त्वरित दूर करावेत, अशी मागणी सामाजिक सेवा प्रतिष्ठान संचलित अन्याय निवारण समिती, आजरा यांच्या वतीने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. “आम्हाला आश्वासने नकोत, त्वरित प्रत्यक्ष कारवाई हवी,” असा ठाम पवित्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, आजरा शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागातील गणेशमूर्ती कुंभार गल्ली येथून नेल्या जातात. ग्रामीण भागातील मूर्ती गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी, तर शहरातील मूर्ती गणेश चतुर्थीच्या दिवशी नेल्या जात असल्याने कुंभार गल्लीसह आगमन व विसर्जन मार्गांवर भाविक आणि वाहनांची मोठी गर्दी होते.
शहरातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असली तरी काही ठिकाणी रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. रस्त्यांवरील खड्डे तसेच पसरलेली खडी यामुळे गणेशमूर्ती वाहून नेणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.
समितीच्या प्रमुख मागण्या
- गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गांची तातडीने संयुक्त पाहणी करावी.
- अपूर्ण रस्त्यांच्या ठिकाणी मुरूम टाकून खड्डे त्वरित बुजवावेत.
- संपूर्ण मार्गावरील अतिक्रमणे व अनधिकृत पार्किंगवर तात्पुरती बंदी घालावी.
- गणपती आगमन मार्गावरील भटके घोडे, गाई व इतर जनावरांमुळे होणारे अडथळे तातडीने दूर करावेत.
- वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नगरपंचायत व पोलीस विभागाने संयुक्त नियोजन करावे.
- विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळांची स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था वेळेत पूर्ण करावी.
गणेशोत्सव हा सर्वांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी), उपाध्यक्ष गौरव देशपांडे, सचिव पांडुरंग सावंतकर, नगरसेविका डॉ. सौ. स्मिता परळकर, संजय जोशी, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण, अभिजीत संकपाळ, अतुल पाटील, संतोष बांदिवडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
