
अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून जीव वाचविण्याच्या कार्याची दखल
पेण | वार्ताहर :
अपघाताच्या निर्णायक क्षणी दिलेली काही मिनिटांची मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते आणि त्यासोबतच संपूर्ण कुटुंबाचा आधारही कायम ठेवू शकते. याच माणुसकीच्या भावनेतून अपघातग्रस्तांना कोणतीही अपेक्षा न ठेवता तातडीने मदत करणाऱ्या संवेदनशील नागरिकांचा आणि सामाजिक संस्थांचा रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘जीवनदूत पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
RCF सभागृह, कुरुळ येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात पेणचे श्री. कल्पेश शरद ठाकूर यांना अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल ‘जीवनदूत पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास विभागाचे महाराष्ट्र राज्य मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते श्री. कल्पेश ठाकूर यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. कल्पेश ठाकूर यांना मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण पेण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि माणुसकीच्या भावनेतून केलेल्या मदतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
“मदतीचा हात पुढे करणारे हे हातच खरे जीवनदूत आहेत. अपघातग्रस्त व्यक्तीला वेळेवर मिळालेली मदत म्हणजे केवळ उपचाराची सुरुवात नाही, तर एका कुटुंबाला पुन्हा हसण्याची संधी असते.” असा संदेश या अभियानातून देण्यात आला.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदतीचा हात पुढे करावा आणि माणुसकीची ही साखळी अधिक मजबूत करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. काही मिनिटांची मदत एखाद्या आयुष्याची नवी सुरुवात ठरू शकते, हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती आणि सुरक्षित वाहतुकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीची विशेष किनार लाभली.
