
कपेवंचा येथील घटनेने खळबळ; मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशीची मागणी
अहेरी (गडचिरोली) | प्रतिनिधी : अहेरी तालुक्यातील कपेवंंचा येथे नियमित लसीकरणानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या पवन शामराव तलांडी या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
लसीकरणानंतर प्रकृती बिघडल्याचा पालकांचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, कपेवंचा येथील पवन तलांडी या बाळाला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लसीकरण केले. बाळाचे वडील शामराव तलांडी यांच्या म्हणण्यानुसार, बाळाला चार इंजेक्शन्स आणि दोन प्रकारची औषधे देण्यात आली होती. लसीकरणानंतर काही वेळातच बाळाला तीव्र ताप आला आणि त्याची प्रकृती बिघडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
यानंतर कुटुंबीयांनी परमिली आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र कोडसेपल्ली येथील आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले. रात्री सुमारे ८ वाजता बाळ झोपले. मात्र, मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास आई सुनीता तलांडे यांना बाळामध्ये हालचाल जाणवली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित
बाळाची हालचाल थांबल्याचे लक्षात आल्यानंतर वडिलांनी गाव पाटील कोत्ता मंगरू आत्राम आणि आशा वर्कर सुशीला मडावी यांना माहिती दिली. त्यानंतर बाळाला रुग्णवाहिकेतून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.
मृत्यूचे कारण अधिकृत अहवालानंतर स्पष्ट होणार
लसीकरणानंतर बाळाची प्रकृती बिघडल्याचा कुटुंबीयांचा दावा असला, तरी बाळाचा मृत्यू लसीकरणामुळेच झाला की अन्य कोणत्या वैद्यकीय कारणामुळे, हे शवविच्छेदन, वैद्यकीय तपासणी आणि अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेची आरोग्य विभागाने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी कुटुंबीयांसह येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष नागेश मडावी यांनी केली आहे.
घटनेची अधिकृत चौकशी करून वैद्यकीय अहवालाच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात यावे, अशी अपेक्षा कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
