आमदार रणधीर सावरकरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या
प्रतिनिधी :
अकोला : विदर्भातील खरीप हंगामावर अनियमित पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
विदर्भात जून आणि जुलै महिन्यात अत्यल्प व खंडित पाऊस झाल्याने पेरणीला विलंब झाला. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह विविध खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाल्याने पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला असल्याचे सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यापूर्वी ३१ जुलै रोजी पीक विमा अर्जाची मुदत वाढविण्याची मागणी आपण केली होती. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार सावरकर यांनी त्यांचे आभार मानले. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता केवळ पीक विम्याची मुदतवाढ पुरेशी नसून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सावरकरांच्या प्रमुख मागण्या
- नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.
- पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी.
- पीक विम्याच्या कक्षेबाहेरील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
- सोयाबीनसह सर्व नुकसानग्रस्त पिकांना हेक्टरी विशेष मदत द्यावी.
- पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करावे.
- पुढील हंगामासाठी बियाणे, खते व अन्य निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना मदत द्यावी.
- जनावरांसाठी चारा डेपो सुरू करून पाण्याची व्यवस्था करावी.
- पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू करावेत.
- विदर्भातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करावी.
शेतकरी चळवळीतून पुढे आलेले आणि स्वतः शेतकरी असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या भावना, समस्या आणि शासनाकडून असलेल्या अपेक्षा सातत्याने सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण करत असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले.
पश्चिम विदर्भासह पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती वेगवेगळी असली तरी अनेक भागांत पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. वर्धा तसेच विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या या मागण्यांची दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करतील आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देतील, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
