
अनियमित पावसामुळे खरीप पिके धोक्यात; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगाम अडचणीत आला असून, आता शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या सणांवरही दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. आज साजरा होणाऱ्या बैलपोळा सणावरही दुष्काळाचे संकट स्पष्टपणे जाणवण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी जेमतेम झालेल्या पावसाच्या भरवशावर पेरणी केली. त्यानंतर कर्ज काढून फवारणी, मशागत आणि खुरपणीची कामे केली. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. पिकांची झालेली नुकसानकारक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, अनेक शेतकऱ्यांनी शेताकडे जाणेही टाळल्याचे चित्र आहे.
एकीकडे पिकांचे नुकसान होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा भार आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा ज्येष्ठ राजकीय नेते मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळाली नाही तर त्याचा परिणाम केवळ शेतकरीच नव्हे, तर संपूर्ण जनतेवर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नुकतीच झालेली खांदे मळणीही यंदा साधारण स्वरूपात पार पडली. दरवर्षी या काळात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आनंद यंदा मात्र कमी झाल्याचे चित्र आहे. आता बैलपोळा सणावरही दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बळीराजाच्या सणावरही चिंतेची छाया
बैलपोळा हा शेतकरी आणि त्याच्या पशुधनाशी जोडलेला महत्त्वाचा सण आहे. मात्र, यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे अर्थचक्रच विस्कळीत झाले असून, त्यामुळे सणाचा उत्साहही कमी झाल्याचे दिसून येत आहे. शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
