प्रदीप ताजने
पातूर (प्रतिनिधी)
पातूर तालुक्यात ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपून गेली असून बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर देऊळगाव-भानोस येथील शेतकऱ्यांनी आक्रमक होत दि. ०९ सप्टेंबर रोजी पातूर तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांना निवेदन दिले. पातूर तालुका तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
जून-जुलैमध्ये पावसाने दमदार सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर तब्बल ५० दिवसांचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद, मूग, ज्वारी ही पिके डोळ्यादेखत जळून गेली आहेत. हजारो रुपये खर्च करून, उसनवारी करून पेरलेले पीक मातीत गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी फिरवलेले आर्थिक चक्र आता सावकारकीच्या चक्रव्यूहात अडकले असून आसमानी संकटासोबतच आर्थिक संकटही उभे राहिले आहे.
जेव्हा निसर्गाची साथ सुटते तेव्हा केवळ पिकेच जळत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या आशा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब विस्कळीत होते. अशी व्यथा शेतकऱ्यांनी निवेदनात मांडली आहे. तात्काळ पिकांचे पंचनामे करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आणि हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
या निवेदनावर गजानन जगमाथ गोळे, मनोहर प्रभू उपर्वट, किशोर गोळे, भारत कैलास उपर्वट, मोहन उपर्वट, शीलवंत तेजराव उपर्वट, अविनाश ओंकार उपर्वट, गुंताबाई तेलगोटे, शांताबाई उपर्वट, छाया दीपक उपर्वट, छाया एकनाथ उपर्वट, कमलाबाई मा. उपर्वट, प्रमिला घनमोडे, आशाबाई उपर्वट, रमाबाई अंभोरे, सिलाबाई महादेव उपर्वट, विमलबाई उपर्वट यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
प्रतिक्रिया :
“मेहनतीने आणि उसनवारी करून पेरलेले पीक डोळ्यादेखत जळताना पाहून छाती फाटते.”
– गजानन जगमाथ गोळे, शेतकरी“सोयाबीन पीक डोळ्यादेखत जळून खाक झालं, उरली फक्त शेतात माती आणि पाचोळा.”
– मनोहर प्रभू उपर्वट, शेतकरी“शासनाने तात्काळ पातूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि पिकांचे पंचनामे करून प्रधानमंत्री पीक विमा आणि हेक्टरी आर्थिक मदत द्यावी.”
– शीलवंत उपर्वट, सामाजिक कार्यकर्ते











