पातूर (प्रतिनिधी) | सैनिक आणि शेतकरी या दोन देशाच्या आधारस्तंभांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने लोणावळा येथे तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. मनोज डांगे सर, श्री. संजय सतई सर आणि श्री. निलेश निकम सर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले श्री. देवीदास नाईक करे सर यांचे अनमोल मार्गदर्शन. त्यांनी सैनिकांच्या कुटुंबियांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि संघटनात्मक बांधणी या विषयावर सविस्तर आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या महत्त्वपूर्ण शिबिरामध्ये पातूर तालुकाध्यक्ष श्री. रविकुमार रमेश तायडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पातूर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.
जिल्हाध्यक्षा वर्षाताई बगाडे यांची राज्यपदी भरारी
शिबिरादरम्यान फाउंडेशनसाठी अभिमानाचा क्षण ठरला. फाउंडेशनच्या कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्षा माननीय सौ. वर्षाताई संजय बगाडे यांची महाराष्ट्र राज्य महिला सक्षमीकरण पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या गौरवास्पद नियुक्तीबद्दल शिबिरात त्यांचा सत्कार करण्यात आला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण आणि समाजसेवेच्या कार्याला राज्यभरात अधिक बळ मिळणार आहे.
“संस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेले प्रशिक्षण हे पातूर तालुक्यात सैनिक आणि शेतकरी कल्याणाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” अशी माहिती पातूर तालुकाध्यक्ष रविकुमार तायडे यांनी दिली.










