
मराठा बांधवांचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार..
धाराशिव दि.११ (जिल्हा प्रतिनिधी :- विकास वाघ) मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मराठा भवन व भगवा ध्वज अभिमानाने फडकण्यासाठी धाराशिव येथे ध्वज बांधण्याची मागणी मराठा बांधवांनी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे केली होती. त्यावेळी त्यांनी मुंबईला येऊन पाहणे करा असे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्ह्यातील मराठा बांधवांना मुंबई येथील त्यांच्या ओवळा माजीवाडा या मतदार संघात सुरु असलेल्या मराठा भवनचे काम व तिरंगा स्तंभ पाहण्यास बोलावून घेतले. मराठा बांधवांनी त्याची पाहणी केली आहे. त्यामुळे सरनाईक यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली असून लवकरच धाराशिव शहरात मराठा भवन व भगवा ध्वज फडकण्यासाठी ध्वज स्तंभ बांधकाम करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारचे काम करणारे लोकप्रतिनिधी जिल्ह्याला मिळाल्यास जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा सूर मराठा बांधवांमधून निघत आहे. तस बोले तैसा चाले अशी कृती असलेल्या मंत्री सरनाईक यांचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता मराठा बांधवांनी त्यांच्याकडे जिल्ह्यात भव्य दिव्य भगवा ध्वज अभिमानाने फडकवण्यासाठी १५१ फुटांचा ध्वज स्तंभ उभारवा. तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठी मराठा भवन उभारावे अशी मागणी धाराशिव जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने केली होती. मराठा बांधवांच्या मागण्या समजून घेऊन पालकमंत्री सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजीवाडा मतदार संघात सुरु असलेल्या मराठा भवनाच्या कामाची व माजीवाडा सिग्नल येथील भव्य १०१ फूट उंच तिरंगा झेंडा स्तंभाची पाहणी करण्याच्या सूचना मराठा बांधवांना केल्या होत्या. त्यांच्या सूचनेनंतर धाराशिव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नितीन लांडगे यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा सकल मराठा बांधवांच्या शिष्टमंडळाला मुंबई येथील ठाणे व मीरा भाईंदरला नेण्याची व्यवस्था व पाहणी दौरा करण्यात आला. या शिष्टमंडळाने मराठा भवनाचे युद्ध पातळीवर सुरु असलेले काम तसेच माजीवाडा येथील भव्य तिरंगा स्तंभाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात संपूर्ण विकास कामांचा लेखा जोखा समजून घेत आवश्यक गोष्टी टिपून घेऊन या वास्तूंचा अभ्यास शिष्टमंडळाने केला. पाहणी दौऱ्यानंतर सर्व मराठा बांधवांची व पालकमंत्री सरनाईक यांची सामूहिक बैठक पार पडली. मंत्री सरनाईक यांच्या भेटीत धाराशिव येथील मराठा बांधवांनी आपले अनुभव व सूचना मंत्री सरनाईक यांना सांगितल्या. त्यांनी उपस्थित सर्व मराठा बांधवांच्या शिष्टमंडळाचे म्हणणे लक्षात घेऊन लवकरच धाराशिव जिल्हा सकल मराठा बांधवांचे स्वप्न पूर्ण होईल असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले. यावेळी नितीन लांडगे, सुधीर पाटील, विनोद गपाट, बलराज रणदिवे, चेतन कात्रे, रोहित पडवळ, अमोल जाधव, अक्षय नाईकवाडी, संकेत सुर्यवंशी, प्रदीप सुर्यवंशी, संदीप इंगळे, गणेश साळुंके, खंडू राऊत, आबा वायकर, स्वप्नील पाटील, अमित पाटील आदी उपस्थित होते..
Discussion about this post