नांदेड (ता. २८) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) चे २५वे नांदेड जिल्हा अधिवेशन बुधवार, दि. २८ मे रोजी मुखेड येथे उत्साहात पार पडले. अधिवेशनाची सुरुवात क्रांतिकारक भगतसिंग यांना अभिवादन करून करण्यात आली.
अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी नेते व डीवायएफआय चे पदाधिकारी अंकुश माचेवाड यांच्या हस्ते झाले. एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी अधिवेशनाला मार्गदर्शन केले, तर शेतमजूर युनियनचे नेते कॉ. विनोद गोविंदवार यांनी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विजय लोहबंदे होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रफुल्ल कऊडकर यांनी केले.
अहवाल सादरीकरण व ठराव मंजूर
प्रतिनिधी सत्रात संघटनेचा कार्यात्मक, संघटनात्मक, आंदोलनात्मक व शैक्षणिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणारा अहवाल सादर करण्यात आला. त्याआधी शोक ठराव मांडून दिवंगत कार्यकर्त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
अधिवेशनात विविध महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्द करण्याची मागणी, सर्व विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास निशुल्क करण्याची मागणी, शासकीय आयटीआयचे खाजगीकरण थांबविणे, जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी लढा तीव्र करणे तसेच विद्यार्थिनी व महिला अत्याचारांविरोधात लढा तीव्र करण्याचे ठराव समाविष्ट होते.
नवीन जिल्हा कमिटीची निवड
अधिवेशनात १८ सदस्यीय नवीन जिल्हा कमिटीची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी विजय लोहबंदे तर जिल्हा सचिवपदी मीना आरसे यांची एकमताने निवड झाली.
जिल्हा उपाध्यक्षपदी प्रफुल्ल कऊडकर व स्वप्नील बुक्तरे यांची, तर जिल्हा सहसचिवपदी पवन जगडमवार व विकास गायकवाड यांची निवड करण्यात आली. जिल्हा कमिटी सदस्य म्हणून अक्षय सागरे, साहेबराव सोनसाळे, नितीन सोनकांबळे, अमोल गायकवाड, सोनल पाईकराव, नेहा कऊडकर, भारत पवार, शरद खंदारे व भीमराव सोनकांबळे यांची निवड झाली असून तीन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
८६ प्रतिनिधींची उपस्थिती
अधिवेशनात जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधून एकूण ८६ प्रतिनिधी सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व सचिव यांनी मनोगत व्यक्त केले. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुखेड तालुक्यातील एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



