निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराजांच्या अवतारकार्यात लोकोद्धार झाला. बाबाजींनी अनुष्ठान, गुरुकुल, शिक्षण, कृषी सेवा अशा परंपरा दिल्या. आश्रमांची निर्मिती करून समाजाला दिशा दिली. हीच परंपरा बाबाजींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज पुढे नेत आहेत. म्हणूनच ”या मातीचे सोने झाले, बाबा तुम्हांमुळे” हा भाव भक्तांच्या हृदयात नेहमी असतो. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या पर्वकालावर जय बाबाजी भक्त परिवाराची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळनगरीमध्ये भाविकभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
पहाटे चार वाजता सद्गुरु बाबाजींच्या संकल्पित समाधी मंदिरात पहाटे पाद्यपूजा व अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर नित्यनियम निधी पाठ व बाबाजींची महाआरती संपन्न झाली. त्यानंतर सकाळी वेरूळ नगरीतून बाबाजींच्या चांदीच्या रथाची भव्य मिरवणूक पार पडली. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत व ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात जगद्गुरु बाबाजींच्या परंपरेतील पादुकांचे पाद्यपूजन प.पू. महात्माजी, ज्येष्ठ संत स्वामी लक्ष्मणगिरीजी महाराज, श्री १०८ महंत स्वामी सेवागिरीजी महाराज व आश्रमीय संतांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या विद्यार्थी संस्कार शिबिरातील बालकांच्या मौनव्रताची सांगता करण्यात आली. या महोत्सवाच्या प्रसंगी प्रवचनात प.पू.महात्माजींनी भस्मस्नान करून आपल्या वैराग्याची प्रचिती दिली. गुरु शिष्यांचा हा भव्य सोहळा १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव, श्रीलक्ष विनायक गणेशाच्या साक्षीने संस्मरणीय असाच राहिला.
या कार्यक्रमात सेंद्रिय शेतीची कास धरण्याचे आवाहन उपस्थित भाविकांना करण्यात आले.
संस्कारक्षम समाज घडविण्यासाठी बाबाजी परंपरा असल्याच्या उल्लेख यावेळी प्रवचनात केला. कार्यक्रमासाठी निफाडचे आमदार दिलीपकाका बनकर आवर्जून उपस्थित होते.गुरुपौर्णिमेच्या उपस्थित गुरुबंधूंनी बाबाजींचा आशीर्वाद प्राप्त केला.










