जत प्रतिनिधी :-आज मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे कर्तबगार नेते, मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली. यावेळी धनगर आरक्षणाच्या लढ्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांचे प्रश्न मांडले आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी सविस्तर निवेदन दिले.
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात अनेक बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. हे बांधव त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार होते. त्यांच्या जाण्याने या कुटुंबांवर ओढवलेले संकट गंभीर आहे.
या अनुषंगाने, पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी आम्ही शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
🔹 आर्थिक मदत: धनगर आरक्षण चळवळीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून’ ₹२५ लाख आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. 🔹 शासकीय नोकरी: उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात यावा.
यावेळी माझे सहकारी आमदार मा. श्री. बाबासाहेब देशमुख हे देखील उपस्थित होते.
“धनगर समाजाच्या न्यायहक्कासाठीचा हा लढा आम्ही असाच ठामपणे आणि सातत्याने सुरू ठेवू. पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.”




