गारगोटी (प्रतिनिधी) – “काय बोलावे, काय लिहावे आणि काय मांडावे हेही आता आपल्या हातात राहिलेले नाही. व्यवस्थेविरोधात बोलणे अक्षम्य गुन्हा ठरत असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येत आहेत. अशा वेळी लोकशाहीच्या रक्षणासाठी साहित्यिकांनीच ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पुढे आले पाहिजे,” अशी ठाम भूमिका कवी डॉ. चंद्रशेखर कांबळे यांनी मांडली.
गारगोटी येथे जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ग्रंथ महोत्सवातील कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
डॉ. कांबळे पुढे म्हणाले, “चांगल्या वाचनातून लेखकाला आत्मशोध घेता येतो. आत्मशोध हा कवितेजवळ जाण्याचा सक्षम मार्ग आहे. सकस वाचनातून दर्जेदार साहित्य निर्मिती होते. सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वातावरणात तसेच समूहमनातील अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर वंचित, शोषितांच्या वेदना व मानवमुक्तीचा आवाज साहित्यातून उमटणे आवश्यक आहे.”
लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात येत असताना लिहिणाऱ्या हातांनीच ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गावाचे तुटलेपण, शेतकरी बापाची अवस्था, पावसाची अनिश्चितता तसेच वर्तमानातील राजकीय व सामाजिक प्रदूषण यांसारख्या विषयांवर कवी राजन कोनवडेकर, रवींद्र कामत, मंदार पाटील, विद्या खामकर, विनायक चौगले, मायकल डिसोजा व पी. एस. कांबळे यांनी आपल्या कवितांमधून प्रभावी मांडणी केली.
विशेषतः कवी विद्या खामकर यांच्या कविता व चारोळी सादरीकरणास रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले. विक्रम वागरे यांच्या निवेदनामुळे संमेलनात रंगत आली. जिल्हाभरातून शेकडो ग्रंथप्रेमी या कवी संमेलनास उपस्थित होते.
ग्रंथ महोत्सवातील हे कवी संमेलन साहित्यप्रेमींसाठी विचारप्रवर्तक ठरले.








