गेली कित्तेक वर्षांपासून हार्ट ऑफ सिटी अशी ओळख असणाऱ्या विश्रामबाग परिसरातील सांगली मिरज रस्त्यावरतील ३६ अनधिकृत खोक्यांवर अखेर आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती मध्ये जे सी बी चालवला गेला आणि या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. महापालिका आयुक्त श्री. सत्यम गांधी यांच्या थेट निर्देशानुसार, आज विश्रामबाग चौक (जुना जकात नाका) व दांडेकर बझार समोरील अनेक वर्षांपासून असलेले ६७ अनधिकृत खोक्यांचे अतिक्रमण पूर्णपणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.सदर अतिक्रमण हटवण्यापूर्वी नगररचना विभागातर्फे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. उपायुक्त (सा.प्र.) श्रीमती अश्विनी पाटील यांच्या मागदर्शना खाली सहाय्यक संचालक नगररचना श्री. हणमंत मारनूर यांच्या पथकाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील विविध कलमान्वये संबंधित सर्व ६७ खोकी धारकांना पूर्वसूचना (नोटीस) बजावली होती. विहित मुदतीत अतिक्रमण न हटवल्यामुळे आज प्रशासकीय बळाचा वापर करून ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील ,अधीक्षक अतिक्रमण निर्मूलन मद्रासी मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर मुख्य सुरक्षा अधिकारी मुकेश मिरजकर यांच्या पथकांमार्फत ही मोहीम राबवण्यात आली. यासोबतच महापालिकेचे इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अनेक वर्षांपासून या अनधिकृत खोक्यांमुळे सांगली-मिरज मुख्य रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. हे अतिक्रमण हटवल्याने रस्ता रुंद झाला असून नागरिकांनी प्रशासनाच्या या धाडसी भूमिकेचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. यावेळी आयुक्त सत्यम गांधी म्हणाले “शहराच्या नियोजित विकासात आणि वाहतुकीच्या प्रवाहात अनधिकृत बांधकामे हा सर्वात मोठा अडथळा आहे. यापुढेही सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे कोणत्याही दबावाशिवाय हटवली जातील. नागरिकांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू नये, अन्यथा जप्ती व फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल.” ज्या अनधिकृत बांधकामांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे; अन्यथा महानगरपालिकेमार्फत होणाऱ्या निष्कासनाचा खर्च संबंधित मालकांकडूनच वसूल केला जाईल आणि बांधकामाचे साहित्य व मशिनरी जप्त केली जाईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.











