पिंपळनेर प्रतिनिधी – अशरफ पठाण
पिंपळनेर (जि. धुळे) येथे लग्नसमारंभादरम्यान झालेल्या भीषण चाकूहल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, हळदीच्या कार्यक्रमानिमित्त नातेवाईक जमले असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या काही व्यक्तींमध्ये जुना वाद उफाळून आला. सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह संदेशांवरून वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेकर पवार (३५), सुरेश मोहन गोसावी (५५) आणि साहिल सुरेश गोसावी (२१) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच पंकज, सुरेश आणि सागर गोसावी हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेनंतर पिंपळनेर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी किरण करें यांनी तातडीने पथक रवाना केले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय पाडे व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. गुजरात सीमेवरून तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लग्नसमारंभात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.









