शहादा प्रतिनिधी.संतोष आखडमल
शहादा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने “आत्मनिर्भर युवती अभियान” अंतर्गत शहादा पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेट दिली.
कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत फक्त विद्यार्थिनींना त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वावलंबन विकसित करण्यासाठी सायबर-गुन्हेगारी जागरूकता, बँक व्यवहार जागरूकता, कृषी जागृती, आरोग्य जागरूकता, स्वयंरोजगार योजना अशा विविध मार्गांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ पासून विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आत्मनिर्भर युवती अभियान योजना सुरू केली आहे. या चालू शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मध्ये कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी विषयी सायबर गुन्ह्यांविषयी शहादा पोलिस स्टेशनला भेट दिली.
यावेळी शहादा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण सूर्यवंशी, पोलीस पाटील युवराज पाटील, प्राचार्य डॉ एस.पी.पवार उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थीनी सांगितले की, सध्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत असून सोशल मीडियाचा वापर जपून व व्यवस्थित करावा तसेच सध्या याचा गैरवापर करून सर्व फसवणूक ही होत आहे.
त्यासाठी सायबर क्राईमची करडी नजर आहे. सायबर गुन्ह्याबद्दल माहिती दिली आणि स्वतंत्र कसे राहायचे हे देखील शिकवले. यावेळी 112 क्रमांकाचे महत्त्व याविषयी माहिती दिली तसेच सोशल मीडिया आणि ऑनलाइन फ्राड कशा पद्धतीने होतात आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थीनी न घाबरता, संकोच न बाळगता आपल्याजवळ एखादा अनुचित प्रकार घडला असेल तर तात्काळ पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवावी.
या क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत विद्यार्थीनीच्या मनात पोलीस प्रशासनाबाबत असलेली भिती, गैरसमज दूर व्हावे तसेच विद्यार्थीनीनी पोलिसांची कार्यपद्धती आणि इतर जबाबदारीची माहिती देण्यात आली. पोलीस खात्याचे कार्य प्रत्यक्ष अनुभवणे आणि कायद्याची अंमलबजावणी कशी केली जाते तसेच विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमधील विविध विभाग तक्रार नोंदणी कक्ष, तपास विभाग, बंदीगृह, आणि सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांना भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून कायदा, शिस्त, आणि नागरिकांची सुरक्षा याबद्दल मार्गदर्शन व सविस्तर माहिती दिली.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थीनीनी संवाद साधला. ही क्षेत्रभेट विद्यार्थीनींसाठी शैक्षणिकदृष्ट्या तसेच सामाजिक जाणीव वाढवणारी ठरली. पोलिसांची कठोर मेहनत आणि सतर्कता याचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजले. “पोलीस फक्त गुन्हेगारांना पकडत नाहीत, तर समाजात शांतता आणि विश्वास निर्माण करतात,” असे विद्यार्थीनींचे मत होते. या आत्मनिर्भर युवती अभियानात ५० पेक्षा जास्त विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला होता.
सदर कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.हितेंद्र चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास अधिकारी व युवती सभा प्रमुख प्रा.सौ. अमृता पाटील, प्रा.डॉ सुनीला पाटील, प्रा.आकाश जैन, प्रा.हितेंद्र चौधरी, प्रा.दिवाकर पाटील, प्रा.मृणाल पेंढारकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.








