
महाशिवरात्रीनिमित्त शेळपवाडी येथे शिवतेज तरुण मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला तालुक्यातील विविध शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिली ते सातवीचा लहान गट आणि आठवी ते बारावीचा मोठा गट अशा दोन गटांत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या प्रदर्शनात व्यंकटराव हायस्कूलची विद्यार्थिनी आस्था सचिन गुरव हिने “पिझो इलेक्ट्रिसिटी – मानवी दाबातून वीजनिर्मिती” या विषयावरील अभिनव उपकरण सादर केले. मानवी दाबाच्या सहाय्याने विद्युत ऊर्जा निर्माण होऊ शकते, हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून दाखवणाऱ्या या संकल्पनेने प्रेक्षकांसह परीक्षकांचीही विशेष दाद मिळवली. परिणामी, आस्था गुरव हिला प्रथम क्रमांकाचा मान पटकावता आला.
पारितोषिक वितरण समारंभात आस्था गुरव हिला शिल्ड, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका सौ. ए. एस. गुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या गुणवंत विद्यार्थिनीला संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतरावजी शिंपी, संचालक मंडळ, प्राचार्य एम. एम. नागर्डेकर तसेच पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले. शिवतेज तरुण मंडळाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व नवकल्पनांना चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

गाव विकासासाठी कटिबद्ध; जि. प. निवडणुकीतील विश्वास कायम ठेवणार – सुधीर देसाई
हळोली (ता. आजरा) येथील ग्रामस्थांनी जि. प. निवडणुकीत दिलेला विश्वास कधीही विसरणार नाही. स्व. राजारामबापूंपासून हळोली गाव हे आपल्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले असून, या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. शक्य तेवढी विकासकामे पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन नूतन जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी केले.
हळोली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते संजय गुरव यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. यशोदा पोवार यांचा गणपती अमृते व लक्ष्मी कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास आजरा तालुका संघाचे उपाध्यक्ष डी. ए. पाटील, सेवा संस्थेचे संस्थापक संचालक व चेअरमन भिकाजीराव गुरव, देवदास बोलके, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक गणपती कांबळे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती गुरव, स्वप्नाली कांबळे यांच्यासह महिला बचत गट, विविध सेवा संस्था, श्रीकृष्ण महिला दूध संघ, श्री शंकर लिंग संस्था, चाळोबा ग्रुप, जय भीम तरुण मंडळ, विठ्ठल रुक्मिणी सांप्रदायिक वारकरी संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमातून हळोली गावाच्या विकासासाठी एकजूट व सकारात्मक अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.

🎯आजरा कमलकुंज अपार्टमेंट : मूलभूत सुविधांचा अभाव; नगरपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
आजरा येथील साळगाव रोडलगत असलेल्या कमलकुंज अपार्टमेंटमध्ये आवश्यक भौतिक व सुरक्षिततेच्या सुविधा अपूर्ण असतानाही नगरपंचायतीने पूर्णत्वाचा दाखला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून नगरपंचायतीकडे तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
अपार्टमेंटमधील ठळक त्रुटी
इमारतीसाठी नगरपंचायतीकडून नियमित पाणीपुरवठा नाही; पर्यायी व्यवस्था देखील नाही
सांडपाणी व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने न करता थेट वनविभागाच्या हद्दीत सोडण्यात येत असल्याचा आरोप
फायर फायटिंग (अग्निसुरक्षा) यंत्रणा उपलब्ध नाही
CCTV यंत्रणा कार्यान्वित नाही
100% रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी नाही
लिफ्ट वापरण्यास योग्य असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र व बॅकअप व्यवस्था नाही
अनेक फ्लॅटमध्ये अंतर्गत मूलभूत सुविधा अपूर्ण
सहाय्यक निबंधक, आजरा यांच्याकडून अद्याप हाउसिंग सोसायटी नोंदणी झालेली नाही
रहिवाशांची तक्रार
या त्रुटींमुळे अपार्टमेंटमध्ये पाणीटंचाई, सांडपाण्याची दुर्गंधी तसेच आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. नगरपंचायतीने याबाबत तातडीने हस्तक्षेप करून संबंधित बिल्डरवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विवादाचे मूळ
साळगाव रोडवरील कमलकुंजच्या दोन अपार्टमेंटपैकी बी विंगमध्ये भौतिक सुविधा पूर्ण नसतानाही नगरपंचायतीने पूर्णत्वाचा दाखला दिला. दाखला मिळाल्यानंतर आता संबंधित बिल्डर आवश्यक सुविधा पूर्ण करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
निवेदन देताना उपस्थित
संभाजी पाटील, संतोष ढोणक्षे, दीपक जोशी, अरविंद देशमुख, दत्तात्रय पालकर, सातापा कांबळे, श्रीधर कुराडे यांच्यासह कमलकुंज ए व बी विंगमधील अनेक सदनिका धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➡️ रहिवाशांची ठाम भूमिका:
“जोपर्यंत सर्व मूलभूत व सुरक्षिततेच्या सुविधा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत नगरपंचायतीने दिलेला पूर्णत्वाचा दाखला रद्द करावा.”





