कणकवली तालुका (प्रतिनिधी):
सिंधुदुर्ग जिल्हा येथील आंबा बागायतदारांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली.
यावर्षी वातावरणातील बदलांमुळे आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असून जिल्ह्यातील आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील आंबा उत्पादकांचे असे नुकसान यापूर्वी कधीही झाले नव्हते. आंबा पिकांवर मोहोर न आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली. पुढील काळात अवेळी पाऊस किंवा तीव्र उष्णता वाढल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असेही नमूद करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आंबा पिकावरील परिस्थिती नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून कोकणातील आंबा बागायतदारांना शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक अहवाल सादर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, अशा सूचना देण्यात आल्या.
बैठकीस तृप्ती धोडमिसे (जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग), डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ चे उपकुलगुरू संजय भावे, फलोत्पादन संचालक अंकुश माने, संशोधन संचालक डॉ. व्ही. यू. शहारे, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ विभागप्रमुख डॉ. पुष्पा पाटील, कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय देसाई, कृषी विभागाचे अवर सचिव ललितकुमार धायगुडे तसेच जिल्ह्यातील आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासन लवकरच ठोस निर्णय घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








