
आजरा | प्रतिनिधी
आजरा नगरपंचायतीने ‘माझी वसुंधरा अभियान २०२३–२४’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात आजरा नगरपंचायतीस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या विविध उपक्रमांमुळे हे यश मिळाले.
हा पुरस्कार पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना नगराध्यक्ष अशोक चराटी, तत्कालीन नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, पाणीपुरवठा अभियंता मानसी कदम, कर निरीक्षक निहाल नायकवडी, शहर समन्वयक कोमल देसाई आदी उपस्थित होते.
आजरा नगरपंचायतीने स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पाणी संवर्धन, हरितीकरण तसेच जनजागृतीपर उपक्रम प्रभावीपणे राबवले. या उपक्रमांमुळेच राज्यस्तरावर आजरा नगरपंचायतीची दखल घेण्यात आली असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या यशाबद्दल नगरपंचायत प्रशासन, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







