पनवेल -कळंबोली ता.प्रतिनिधी : पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली प्रभाग ८ येथील के एल ४, सेक्टर- 4ई परिसरातील भागात ८ दिवसापासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झालेला असून शेकडो कुटुंबांवर अक्षरशः पाणीबाणी ओढवली आहे.लोकांना जेवणासाठी,पिण्यासाठी तसेच बाथरूम व दैनंदिन कामासाठी देखील पाणी उपलब्ध नाही. बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणे ही प्रशासनाची गंभीर चूक असून या मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे.वारंवार तक्रारी करूनही सिडको प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आणि त्याचे रूपांतर आज मोर्चा मध्ये झाले.
स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ विजया कदम यांनी थेट सिडकोच्या पाणी पुरवठा अभियंता श्री प्रफुल देवरे यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरत आक्रमक भूमिका घेतली. “८ दिवसापासून केएल–४ मध्ये पाणी नाही, तरी प्रशासन झोपेत आहे का? आज पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर शेकडो महिलांच्या उपस्थितीत इथेच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला. या वेळी उपमहापौर सौ प्रमिला पाटील यांनी देखील ठणकावून सांगितले कळंबोली तील नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळालेच पाहिजे आणि तो त्यांचा हक्क आहे. या संदर्भात पनवेल महापालिका सिडको अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कळंबोलीतील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे या साठी प्रयत्न करण्यात येईल. जो पर्यंत पाणी पुरवठा सुरू होत नाही तो पर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून तेथील नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याच्या टँकर ची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या वेळी सिडको पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता श्री प्रफुल देवरे यांनी माहिती दिली की सेक्टर -४ इ येथील पाईप लाईन मध्ये पाण्याच्या बॉटल, बॉल सदृश वस्तू व व्हॉल्व चे काही भाग अडकल्यामुळे पाणी पुरवठा बंद होता, आज संध्याकाळ पर्यंत आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले.
आजचा हा मोर्चा आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र अध्यक्षा सौ विजया कदम, उपमहापौर सौ. प्रमिला ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस श्री रविनाथ पाटील, श्री. गणेश लाड, श्री तुकाराम तरसे(सेक्रेटरी,सुविधा सोसायटी),श्री शरद मोहिते, श्री निखिल कारेकर( खजिनदार, सुविधा सोसायटी), श्री.राम पवार , श्री.विलास पाटील सर,सौ मीना जांबुरने, स्वाती राळे , पुष्पां राळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








