
राकेश शेरकी | तालुका प्रतिनिधी
चिमूर (प्रतिनिधी):
चिमूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर आणि शंकरपूरचे सरपंच साईश वारजूकर यांनी आपल्या समर्थकांसह आज मुंबईत भारतीय जनता पार्टीत रीतसर प्रवेश केला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. विशेष म्हणजे, चिमूरचे भाजपा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झाला असून, एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आता एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.
”गटबाजीमुळे नाईलाजास्तव घेतला निर्णय” – डॉ. सतीश
यावेळी आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना डॉ. सतीश वारजूकर यांनी काँग्रेसमधील परिस्थितीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की:
”काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला आहे. या गटबाजीमुळेच चंद्रपूर महानगरपालिकेत हाती आलेली सत्ता गमावण्याची वेळ काँग्रेसवर आली. इतकेच नाही तर सहकार क्षेत्रातील महत्त्वाची असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुद्धा काँग्रेसने याच गटबाजीमुळे गमावली आहे. पुढे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही कार्यकर्त्यांना या गटबाजीचा फटका बसू नये, यासाठी आम्ही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
वारजूकर बंधूंच्या या निर्णयामुळे चिमूर, नागभीड आणि भिसी परिसरातील काँग्रेसची मोठी फळी आता भाजपात सामील झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वारजूकर आणि भांगडिया यांच्यात असलेला राजकीय संघर्ष आता संपुष्टात आला असून, या नव्या समीकरणामुळे चिमूर विधानसभा क्षेत्रात भाजपाची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.



