
आजरा- प्रतिनिधी:- पटसंख्येची अट कायमची रद्द करून वस्ती तेथे शाळा आणि प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक मिळालाच पाहिजे यासारख्या मागण्या घेऊन संविधानातील 7व्या अनुसूचिनुसार, संविधानाच्या 86व्या घटना दुरुस्तीद्वारे अनुच्छेद 21क नुसार वय वर्षे 6 ते 14 पर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी असताना कमी पटसंख्या असल्याचे कारण देत शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करणारा आहे. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, पालक, शाळा व्यावस्थापन समित्या यांच्या वतीने दिनांक 26फेब्रुवारी ते 28फेब्रुवारी 2026 रोजी चंदगड ते कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळापर्यंत राज्यव्यापी शिक्षण हक्क यात्रा काढण्यात येत असून त्यानुसार 26फेब्रुवारी रोजी आजरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवतीर्थावर अभिवादन करून आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही पाठवण्यात आल्या.

निवेदनात म्हटले आहे की, आपल्या राज्याच्या शिक्षण विभागाने 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दिशेने हालचाली सुरु आहेत. राज्यातील सर्वच जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाने त्यासाठीची माहिती तातडीने संकलित केली आहे. काही जिल्ह्यात तर शाळा बंद करून त्यांना इतर शाळेत समायोजितसुद्धा केले जात आहे. प्रश्नोत्तराच्या तासात शिक्षणमंत्री नाम. दादा भुसे यांनी राज्यातील 355 मराठी सरकारी शाळा बंद पडल्या असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. शिक्षण खात्याच्या धोरणामुळे राज्यातील तांडे, वाड्या, वस्ती आणि दुर्गम भागात असलेल्या शाळांना मोठा फटका बसणार आहे. या शाळांच्यामधून शिक्षण घेणाऱ्या दलित,आदिवासी,भटके,विमुक्त आणि बहुजन कष्टकरी जात वर्गातील मुला मुलींना शिक्षणापासून कायमचे हद्दपार केले जाणार आहे. शिक्षण व्यवस्था खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे.15 मार्च 2024 च्या शासन निर्णयामुळे जनतेच्या मनात तिव्र असंतोष तयार झाला आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने शाळा वाचवा, शिक्षण वाचवा अभियानाअंतर्गत चंदगड ते कोल्हापूर अशी शिक्षण हक्क यात्रा आयोजित केली 3 आहे. दि.26 फेब्रुवारी रोजी सुरु होणाऱ्या या यात्रेची सांगता 28 फेब्रुवारी रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी शिक्षण हक्क यात्रेने होणार असून या लोकचळवळीची योग्य ती दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याविषयी निवेदनातून विनंती करण्यात आली आहे.
**सामाजिक प्रबोधनाचा विडा उचलले, सेवा निवृत्तीनंतरही संत गाडगेबाबा, स्वामी विवेकानंद, तुकाराम महाराज, महात्मा फुले, प्रबोधनकार,शहीद भगतसिंग,आदींचे एकपात्री प्रयोग करून समाजात अखंडपणे जागृती करणारे लेखक, नाटककार सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांची केलेली वेशभूषा आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते.*
यावेळी उपस्थित जिल्हापरिषद सदस्य, राष्ट्रवादीचे गटनेते सुधीरभाऊ देसाई, विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, कॉ. संपत देसाई, आदींची भाषणे झाली. उबाठाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, सुनील शिंदे, युवराज पोवार, डॉ. धनाजी राणे, अल्बर्ट डिसोझा, शिवाजी नांदवडेकर (सर ), अनिल फडके, दिगंबर देसाई, आनंदा कुंभार (साळगाव)दिनेश कांबळे (पेरणोली), उदय नारकर,कॉ. सम्राट मोरे, कृष्णा भारतीय, संजय तर्डेकर, दशरथ घुरे, सुधाकर सावंत,हरिश्चंद्र व्हराकटे आदिजणासह शिक्षक, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजरा हायस्कूलचे तालुका स्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश.
जिल्हा मराठी भाषा समिती, माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ यांचे वतीने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले ते पुढील प्रमाणे.*
▪️*वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक वेदिका विजय पोतदार*
▪️*कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक रिया संतोष पारपोलकर*
▪️*निबंध स्पर्धा द्वितीय क्रमांक अक्षरा सर्जेराव पाटील.*
▪️*कथालेखन स्पर्धा तृतीय क्रमांक वेदिका विजय पोतदार*
▪️*मार्गदर्शक श्री व्ही ए पोतदार*
तालुकास्तरावरील स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा कोल्हापूर येथे मा. जिल्हाधिकारी अमोल एडगे. राजाराम महाविद्यालयाचे मराठी व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. श्री. रघुनाथ कडाकणे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री राहुल पवार, कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांचे उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमांमध्ये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
आजच्या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक : श्री व्ही.ए. पोतदार सर यां सर्वांचे हार्दिक अभिनंदन

मराठीचा दीपस्तंभ श्री. गोपाळ गावडे सरांना ‘चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार’ जाहीर
मराठी राजभाषा दिनानिमित्त चंदगड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व श्री. गोपाळ विठ्ठल गावडे सर यांना ‘चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. मराठी विषयात M.A., B.Ed. शिक्षण घेतलेल्या गावडे सरांनी तब्बल २४ वर्षे मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावत शिक्षण क्षेत्रात आदर्श कार्य उभारले आहे.
भाई दाजीबा देसाई विद्यालय, पार्ले येथे (2000–2013 व 2024 पासून आजतागायत) तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय, गुडेवाडी येथे (2013–2024) त्यांनी शिस्तबद्ध प्रशासन, गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कारप्रधान उपक्रम राबवले.
त्यांच्या नेतृत्वाखाली स्वामी विवेकानंद विद्यालयास दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात “आदर्श शाळा पुरस्कार” मिळाला, तर 2024 मध्ये भाई दाजीबा देसाई विद्यालयास “स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार” प्राप्त झाला.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे स्वीकृत सदस्य आणि चंदगड तालुका मुख्याध्यापक संघाचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
मराठी भाषेप्रती निष्ठा, विद्यार्थ्यांप्रती तळमळ आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर गावडे सरांनी शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. त्यांना मिळालेला “मराठी प्रेरणा पुरस्कार” हा संपूर्ण चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक अभिमानाचा गौरव मानला जात आहे.
आजरा नगरपंचायतीचा १५ लाख ८ हजार शिल्कीचा अर्थसंकल्प सादर.
आजरा नगरपंचायतीची अर्थसंकल्पीय विशेष सभा आज नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये सन २०२५-२६ चे सुधारित आणि सन २०२६-२७ या वर्षाचे तपशीलवार अंदाजपत्रक सादर करण्यात आले. एकूण ४४ कोटी ५६ हजार ४० रुपयांच्या या अर्थसंकल्पात १५ लाख ८ हजार ७५१ रुपयांची शिल्लक दर्शवण्यात आली आहे.
आर्थिक तरतुदींचा गोषवारा (सन २०२६-२७)
अर्थसंकल्पातील महसुली आणि भांडवली उत्पन्नाचा व खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
तपशील अपेक्षित रक्कम (रुपये)
एकूण महसूल जमा ४ कोटी ९८ लाख ८२ हजार ७९०
महसुली खर्च ४ कोटी ९६ लाख २८ हजार ७८९
एकूण भांडवली जमा ३९ कोटी ०१ लाख ७३ हजार २५०
एकूण भांडवली खर्च ३८ कोटी ८९ लाख १८ हजार ५००
एकूण शिल्लक रक्कम १५ लाख ०८ हजार ७५१
अर्थसंकल्पातील मुख्य वैशिष्ट्ये आणि विशेष तरतुदी
या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांकरिता विशेष तरतूद करण्यात आली आहे:
शहर विकास व स्वच्छता: शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सामाजिक कल्याण: दिव्यांग कल्याण निधी, महिला व बालकल्याण विभाग आणि दुर्बल घटकांसाठी विशेष निधी राखीव ठेवला आहे.
पायाभूत सुविधा: सांडपाणी व्यवस्थापन, विद्युत पुरवठा आणि पाणीपुरवठा विषयक कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
गृहनिर्माण: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी तरतूद केली आहे.
शिक्षण व क्रीडा: क्रीडा आणि शिक्षण विषयक कामांसाठी निधीची तरतूद आहे.
नमो उद्यान: शहरात ‘नमो उद्यान’ विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय
नगरपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अनावश्यक खर्च कमी करण्याबाबत सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, आजरा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून अधिक निधी मिळवण्याबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या विशेष सभेला उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि नगरपंचायतीचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.






