तेल्हारा | प्रतिनिधी
पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले असतानाही पिवंदळ बु. (ता. तेल्हारा) येथील शेतरस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, चिखल आणि खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रॅक्टर, बैलगाड्या तसेच इतर कृषी अवजारे शेतापर्यंत नेणे कठीण झाले असून, प्रशासनाने तातडीने शेतरस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गावाच्या शिवारातील मुख्य शेतरस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नसल्याने नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर गुडघाभर चिखल साचला आहे. परिणामी खते, बियाणे आणि इतर शेतीसाठी आवश्यक साहित्य शेतात पोहोचविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शेतीमाल काढणीनंतर मुख्य रस्त्यापर्यंत आणणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
स्थानिक शेतकरी अनंता राऊत म्हणाले, “रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात हेलपाटे पडत आहेत. प्रशासनाने तातडीने खडीकरण किंवा मुरमीकरण करून शेतरस्ते वाहतुकीयोग्य करावेत.”
दररोज ट्रॅक्टर चिखलात अडकत असल्याने शेतीची कामेही विस्कळीत होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून शेतरस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


