बांबवडे | प्रतिनिधी
मलकापूर एसटी आगाराच्या कथित ढिसाळ नियोजनामुळे शाहूवाडी तालुक्यातील प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला. रविवारी (१२ जुलै) सायंकाळी मलकापूर-कोल्हापूर मार्गावरील एसटी बसेस वेळेवर न आल्याने बांबवडे बसस्थानकावर प्रवाशांना तब्बल दोन तास ताटकळत उभे राहावे लागल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ ते रात्री ७ वाजेदरम्यान मलकापूर-कोल्हापूर मार्गावरील एकही एसटी बस बांबवडे स्थानकावर दाखल झाली नाही. त्यामुळे कामावरून घरी परतणारे नोकरदार, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला. बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने सामान्य नागरिकांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय होत असल्याची खंत व्यक्त केली. “सामान्य जनतेच्या वेळेचा हा खेळखंडोबा थांबणार कधी?” असा सवालही संतप्त प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, मलकापूर आगाराच्या कारभाराविरोधात शाहूवाडी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून, एसटीच्या फेऱ्या नियमित न झाल्यास मलकापूर आगारासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन बससेवा नियमित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


