वाशिम शहरातील काटा रोड ते पाटणी चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. ठिकठिकाणी खोल खड्डे पडलेले असून रस्त्याची पृष्ठभाग पूर्णपणे उखडलेली आहे. या मार्गावर दररोज हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, व्यापारी व सर्वसामान्य वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न होणे ही गंभीर बाब आहे.
यामुळे अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती अधिकच बिकट होते. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाहीत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक व पाटणी चौक येथील ट्राफिक सिग्नल अनेक दिवसांपासून नीट कार्यरत नसल्याची तक्रार आहे. सिग्नल बंद किंवा बिघडलेल्या अवस्थेत असल्यामुळे वाहतुकीत गोंधळ उडत आहे व अपघातांचा धोका वाढला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अशी निष्क्रिय व्यवस्था असणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
नगरपरिषद प्रशासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृती करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर तात्काळ आणि ठोस निर्णय घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, याची नोंद घ्यावी.
म्हणूनच वाशिम नगरपरिषद प्रशासनाने काटा रोड ते पाटणी चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून मजबूत डांबरीकरण करावे तसेच संबंधित चौकांमधील ट्राफिक सिग्नलची त्वरित दुरुस्ती करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, ही जनतेची ठाम मागणी आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड मान्य नाही!






