
नितेश गट्टीवार प्रतिनिधी गडचिरोली (चामोर्शी):दि.६मार्चमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असला तरी हा अर्थसंकल्प गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारा असल्याची टीका गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन सुमारे ७० हजार रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे, मात्र यापुर्वीही सुरजागड व कोणसरी प्रकल्प सुरू करताना स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते.प्रत्यक्षात या प्रकल्पांमधून जिल्ह्यातील किती युवकांना रोजगार मिळाला,याची स्पष्टपणे माहिती शासनाने दिली नाही.त्यामुळे रोजगाराच्या नावाखाली केवळ आश्वासनांचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप ब्राम्हणवाडे यांनी केला. गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक वनसंपत्तीने समृद्ध असतांना विविध प्रकल्पांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात आहे.दुसरीकडे जिल्ह्यात पाच कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा करण्यात आली आहे.प्रत्यक्षात मात्र ही पर्यावरण संवर्धनाची योजना नसून केवळ निधी खर्च करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी तयार करण्यात आलेली योजना असल्याची टीका महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.









