



नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली) : दि.९ मार्च चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित जेएसडब्लु प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक व उत्पादनक्षम जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या अन्यायकारक जमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील शेतकरी व नागरिक आक्रमक झाले आहेत.या पार्श्वभूमीवर, शासनाने 11 फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या जमीन अधिग्रहणासंदर्भातील शासन निर्णयाचा निषेध म्हणून भेंडाळा घारगाव सगनापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी शासनावर गंभीर आरोप केले.ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी भडकावून, कवडीमोल दराने बळकावून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे काम शासन जाणीवपूर्वक करू पाहत आहे. हा विकास नसून शेतकऱ्यांच्या संसाराचा आणि भविष्याचा संपूर्ण नाश आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची संमती न घेता, स्थानिक ग्रामसभांचा विश्वासात न घेता आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार न करता जमीन अधिग्रहण करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. “जर शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला असून येत्या 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे हजारो शेतकऱ्यांसह धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार असून जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधव उपस्थित रहावे अशी विनंती यावेळी करण्यात आली.यावेळी अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, नेहाल आभारे, आणि मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी व शेतमजूर बांधव उपस्थित होते.




